देशातल्या सर्वशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सुविधा सहा महिन्यांच्या आत उपलब्ध करावी, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना द्यावा लागला, ही केंद्र आणि राज्य सरकारांची बेअब्रू होय! स्वातंत्र्यानंतरच्या 64 वर्षानंतरही देशातल्या बहुतांश प्राथमिक शाळांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहेही नाहीत, ही बाब स्वयंसेवी संस्थेने थेट जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयासमोर नेली. देशातल्या प्राथमिक शिक्षणाच्या तथाकथित पायाभूत सुविधांचाही पंचनामा न्यायालयात झाला. इतक्या काळानंतर सुध्दा राज्यघटनेने शिक्षणाचा हक्क सात ते चौदा वयोगटातल्या मुला-मुलींना देऊनही सरकारांनी, त्याची अमलबजावणी मात्र केलेली नाही, ही बाब अक्षम्य असल्याचा खरमरीत शेरा न्यायालयाने मारला. न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने असा आदेश द्यावा ही बाब केंद्र आणि राज्य सरकारला शरमेची होय! प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण, दुर्गम पाड्या-वाड्यापर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय, शिक्षणाच्या हक्काची सनद अशा अनेक योजनांचे ढोल केंद्र सरकारने गेल्या पाच तपात वारंवार वाजवले. आपल्या विविध योजनांमुळे शिक्षणाच्या सुविधा वाढल्या, प्राथमिक शिक्षणासाठी पात्र असलेल्या मुला आणि मुलींसाठी शिक्षणाची सोय झाली, असा दावा करणाऱ्या केंद्र सरकारची ढोंगबाजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाने उघडी पडली आहे. देशातल्या सरकारी, निमसरकारी, अनुदान मिळणाऱ्या, विनाअनुदानित, अल्प संख्याकांच्या अशा सर्व शाळात या पायाभूत सुविधा दिलेल्या मुदतीत पूर्ण झाल्याच पाहिजेत, असे खंडपीठाने सरकारांना खडसावले आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागातल्या गरीब कुटुंबातल्या मुलींना शाळेत पाठवायचे प्रमाण अद्यापही खूप कमी असल्याच्या वस्तुस्थितीवर न्यायमूर्तींनी बोट ठेवतानाच, शाळांमध्ये स्वच्छतागृहे नसल्यानेच अनेक पालक आपल्या मुलींना शाळांत पाठवत नाहीत किंवा शाळात पाठवायचे बंद करतात, ही वस्तुस्थितीही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. मुलींसाठी सर्व शाळातून स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करायचे आदेशही दिले. या आदेशांची पूर्तता सर्व राज्यात आणि सर्व शाळात झाली नाही तर याचिकाकर्त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असा दिलासाही न्यायमूर्तींनी दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे प्राथमिक शिक्षणाची दैना झाल्याच्या सामाजिक समजावर शिक्कामोर्तब तर झालेच पण केंद्र आणि राज्य सरकारे प्राथमिक शिक्षणाच्या प्रसार आणि दर्जाबद्दल, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल निष्काळजी असल्याचेही उघड झाले. ग्रामीण भागातल्या बहुतांश प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशीच आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा अशा मागासलेल्या राज्यातल्या हजारो प्राथमिक शाळांना अद्याप इमारतीही नाहीत. गावच्या चावडीत, मंदिरात किंवा मिळेल त्या जागेत, झाडाखाली हजारो शाळांचे वर्ग भरतात. हजारो शाळांना कसल्याही प्राथमिक सुविधा तर नाहीतच, पण पुरेसे शिक्षकही नाहीत. एकच शिक्षक. एका शिक्षकाला पाच पाच वर्ग शिकवावे लागतात, अशी स्थिती असलेल्या शाळांची संख्याही देशात प्रचंड आहे. लाखो शाळांना साधा खडू फळाही नव्हता. हे शैक्षणिक साहित्य पुरवायसाठी केंद्र सरकारने खडू फळा योजनेची अमलबजावणी केलेली होती. सर्व प्राथमिक शाळांना खडू-फळा मिळायसाठी स्वातंत्र्यानंतरची पन्नास वर्षे उलटावी लागली, याची शरम राज्यकर्त्यांना कधी वाटली नाही.
प्राथमिक शाळांची दुरवस्था
प्राथमिक शाळांची दुरवस्था
No comments:
Post a Comment